Sunday 15 May 2022

मेघांच्या माहेरा... भाग ४ (अंतिम)

मेघालयमधील चौथा आणि शेवटचा दिवस, खरं तर शिलाँगसाठी राखीव ठेवलेला होता. परंतु, शहरी भागामधील वास्तव्यात  पाहतां आणि अनुभवतां येणाऱ्या  त्याच त्या गोष्टी करण्यापेक्षा, त्यापलीकडे जाऊन वेगळं काहीतरी पाहावं, अनुभवावं अशी सुप्त इच्छा मनात होतीच! आसपासच्या लोकांकडून मात्र, येथील चर्च, बाजार, संग्रहालय ह्यापलीकडे काही माहिती मिळेना. शेवटीं बरीच खोदून खोदून चौकशी केल्यानंतर काहीश्या अनिच्छेनेच ड्रायव्हर म्हणाला, " इथून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर मौफालॉंगचं पवित्र जंगल (sacred forest) आहे. तिथं आत जाता येतं खरं, पण तुम्हाला खरोखरच जायचं आहे का? बरंच चालावं लागेल!" "बरंच म्हणजे किती?" मी पृच्छा केली. "साधारण पाचेक किलोमीटरचा trail आहे" तो म्हणाला. साधं पाच किलोमीटर चालण्याचा इतका बाऊ करण्याला, हसावं की रडावं हेच मला कळेना! "काही हरकत नाही, आपण जंगल पहायलाच जाऊ"असे म्हणतांच, अविश्वासाचा एक कटाक्ष टाकून त्याने आम्हाला तिथे न्यायचे कबूल केले.


जंगलापर्यंत जाण्याचा तासाभराचा प्रवास अतिशय नेत्रसुखद! नेहमी पाठपुरावा करणाऱ्या ढगांची साथ आजही होतीच! आज मात्र, दूर कुठेतरी आकाशात असलेली गंधाची कुपी त्यांनी उघडली असावी! त्यातून सांडलेल्या अत्तराची मातीवर मनसोक्त बरसात करीत मनमोहक सुगंधाची मुक्त उधळण ते आज करीत होते.

आल्हाददायक वातावरणातच त्या रस्त्याने आम्हाला जंगलाच्या नजिकच असलेल्या विस्तीर्ण माळापाशी आणून सोडले. येथे जंगलामध्ये जाण्यासाठी परवानगी काढावी लागते. खासी जमातीसाठी पवित्र असलेल्या ह्या जंगलात पर्यटकांना एकट्याने प्रवेश करण्यास परवानगी नाही. ह्या ठिकाणीच जंगलाच्या सफरीसाठी मार्गदर्शक, अर्थात गाईड मिळतात. हे गाईडदेखील खासी जमातीचेच! 

"तुम्हाला पूर्ण सफर करायची आहे, की अर्धी?" तिथल्या माणसाने प्रश्न केला. "पूर्ण करू आम्ही!" मी उत्तरले. इथेही, काहीश्या अविश्वासानेच आमच्याकडे पाहत त्याने तिकीट दिले आणि एका माणसाला गाईड म्हणून आमच्यासोबत पिटाळले.

समोर पसरलेल्या माळावरून साधारण पाचशे मीटर चालत गेल्यावर आपण जंगलापाशी पोहोचतो. गंमत म्हणजे, पूर्णपणे नैसर्गिक असूनसुद्धा, ह्या जंगलाची हद्द अगदीं आखून दिलेली वाटते. त्यामुळेच की काय, प्रथमदर्शनीं हे जंगल, थेट हॅरी पॉटर मधल्या त्या निषिद्ध जंगलासारखे (forbidden forest), काहीसे गूढरम्य भासते!






"जंगलात शिरण्यापूर्वी तुम्हाला ह्या जागेची माहिती सांगतो" गाईड म्हणाला, "मौफालाँगचे हे जंगल खासी जमातीसाठी खूप पवित्र मानले जाते. ह्याचे कारण म्हणजे, खासी संस्कृतीप्रमाणे काही पूजाविधी आणि प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा येथे पूर्वी चालत असे. आणि हो, आणखीन एक गोष्ट जंगलात आत जाण्यापूर्वी लक्षात ठेवा. ह्या पवित्र जंगलामधून कुणालाही काहीही नेण्याची परवानगी नाही. अगदी, एखादा दगड किंवा झाडाचे पान जरी इथून बाहेर नेलेत, तर ते तुमच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरते असा येथील लोकांचा समज आहे." बोलत बोलत तो आम्हाला घेऊन त्या जंगलात शिरला.

ही माहिती ऐकून एव्हाना माझे कुतूहल जागे झाले होते. "हे बळी कशासाठी दिले जात? आता ही प्रथा चालू आहे की नाही?" मी त्याला प्रश्न केला. "मॅडम, त्याचं असं आहे. खासी लोकांच्या धारणेप्रमाणे मूर्तीमधल्या देवाला आम्ही मानीत नाही. मंदिरात जाऊन पूजाअर्चा, किंवा कर्मकांडही करीत नाही. हे जंगलच नाही, तर सर्वच जंगले, त्यामधली झाडेझुडपे, पक्षी, प्राणी, इतकेच काय, तर येथील जलसंपत्ती ह्या सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे, अशी आमची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच, ह्या श्रद्धेचे प्रतिक असलेले हे जंगल आम्ही पवित्र मानतो!" तो समरसून सांगत होता. "ह्या वनामध्ये असलेल्या वनदेवतेचीं दोन रूपे आहेत असा समज आहे. ह्या वनदेवतेच्या शुभ रूपाला ' लबासा' म्हणतात. हा बिबट्याचे रुप धारण करून येतो. येथील वनसंपदेचा हा संरक्षक आहे. वनदेवतेचे क्रुद्ध, अशुभ रुप मात्र एका सर्पाचे आहे! ह्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी वर्षातून एकदाच हे बळी दिले जायचे. आता मात्र ही प्रथा दर वर्षीं मौफालाँग गावाच्या रहिवासी भागात पार पाडली जाते. खासी जमातीच्या राजाकरवीं हे विधी पार पाडले जातात. विशेष म्हणजे, हा राजा येथील खासी जनतेमधूनच लोकशाही पद्धतीने निवडला जातो. पूर्वी जिथे हे बळी दिले जायचे, त्या जागी दगडी स्मृतिचिन्हें (monolith) आहेत, ती जाता जाता तुम्हाला दाखवेनच!" त्याने ग्वाही दिली.

त्याच्याशी गप्पा मारत आम्ही जंगलामधून जाणाऱ्या दगडी पायवाटेवरून चालत होतो. साधारण एकशे नव्वद एकर जमिनीवर पसरलेले हे जंगल तब्बल आठशे वर्षें जुने आहे. आजूबाजूला, सूर्यकिरणें सुद्धा आत शिरणार नाहीत, इतकी दाट झाडी, आणि थेट आकाशाला भिडणारे उंचच्या उंच वृक्ष! ह्या वृक्षांमध्ये सुमारें सहाशें वर्षें जुनीं रुद्राक्षाचीं विशाल झाडेंही दिसतात. जंगल अगदीं रंगीबेरंगी पानाफुलांनी  नखशिखांत नटलेले! मधूनच, एखाद्या सजवलेल्या लग्नघरामध्ये नव्या नवरीचे कुंकवाच्या पावलांचे ठसे उमटवेत, तसा, ह्रोडोडेंड्राॅनच्या लालचुटुक फुलांचा सडा पडलेला! जंगलामध्ये कोल्हे, विविध प्रकारच्या खारी, शेकरू असे प्राणी आणि पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती आढळतात. हिंस्त्र श्वापदें नाहीतच!






ही दगडी पायवाट जंगलामध्ये काहीं अंतरापर्यंत घेऊन जाते. ह्या वाटेवरच, बळीच्या विधीची तयारी करण्याची जागा, तसेच बळी देताना केल्या जाणाऱ्या पूजेचे स्थान आहे. ह्या दोन्ही ठिकाणीं दगडी स्मृतिचिन्हें आहेत.  बळी देण्याच्या विधीपूर्वी सर्व हत्यारांना धार काढणे, इतर तयारी करणे ह्यासाठी एक विशिष्ट जागा आहे. एकदा ही सर्व तयारी झाली, की मग माघार नाही. तिथून पुढे ह्या तयारीमध्ये काही कमतरता आढळली तर वनदेवतेचा कोप होतो, असा समज आहे. पूजविधीच्या स्थानापाशीं ही पायवाट संपते. जंगलाची अर्धी सफर करणारे पर्यटक येथूनच मागे फिरतात.येथून पुढे कच्च्या वाटेने वाटचाल सुरू होते.







ह्या जागेभोवती आणि जंगलाभोवती फिरणाऱ्या अनेक दंतकथा इथे आणि आसपासच्या गावात प्रचलित आहेत. अशीच एक मान्यता म्हणजे, ह्या पवित्र वनामधून कोणतीही वस्तू बाहेर घेऊन जाऊ नये. तसें केल्यास तो वनदेवतेचा अपमान समजला जातो. असे करणारी व्यक्ती वनदेवतेच्या क्रोधास पात्र होऊन आजारी पडते, असे येथील लोक सांगतात. १९७० मध्ये येथून काही ओंडके बाहेर नेण्याचा भारतीय सैन्यदलाचा प्रयत्न, ट्रक जंगलामध्ये बंद पडल्यामुळे साफ फसला, अशीही एक आख्यायिका आहे. येथील खासी जमातीमधल्या पूर्वजांचे मृतात्मे ह्या जंगलामध्ये वास करून आहेत अशीही येथील लोकांची श्रद्धा आहे. 

खरं- खोटं माहीत नाही, पण कानोकानीं पसरलेल्या ह्या आख्यायिका आणि पिढ्यान् पिढ्या रुजलेल्या परंपरा येथील मानवाचे निसर्गाशी असलेले गहिरे बंध पुन्हा एकदा अधोरेखित करतात. ह्या धारणांमागचा हेतू येथील निसर्गसंपत्तीचे संरक्षण करणे हाच असावा!  माणूस बदलतो, धर्म बदलतो, तसतश्या आस्था आणि श्रद्धेच्या परिभाषादेखील बदलतात. वाचनात आलेल्या माहितीनुसार  मेघालय मधील काही भाग धर्मांतराच्या चक्रात अडकून, तेथील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे लोकांचीं मूळ श्रद्धास्थानें नष्ट झालीं. ह्या बदलत्या आस्थेमुळे मेघालयच्या ह्या इतर भागातली अश्या प्रकारचीं पवित्र जंगलें नष्टही झालेलीं आहेत! श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये अगदीं पुसट रेष असते. येथे प्रचलित असलेल्या दंतकथांना शहराकडील विज्ञानाची कास असलेले शिकलेसवरलेले लोक कदाचित अंधश्रद्धा, भाकडकथा म्हणून हिणवतीलही.  माझ्या लेखीं मात्र, नैसर्गिक समतोलाचे महत्त्व ओळखून ती साधनसंपत्ती मर्यादेत आणि गरजेपुरतीच वापरावी ह्याची जाणीव असलेल्या सूज्ञ खासी पूर्वजांनी घालून दिलेल्या ह्या रूढी- परंपरांएवढी डोळस श्रद्धा दुसरी कोणतीही नव्हती!

जंगलातल्या त्या कच्च्या वाटेने भटकंती करतां करतां तास दीड तास कसा गेला, हे समजलेही नाही. पुनश्च त्या माळावर पोहोचलो, तोवर सायंकाळ झालेली होती. ह्या माळावर तासन् तास शांत बसावे, समोरच्या ठेल्यावर मिळणाऱ्या वाफाळत्या ' मॅगी' चा मनसोक्त आस्वाद घ्यावा! तेथे बसलेलो असताना, तेथील एका पर्यटकाने केलेल्या, "अंदर देखनेलायक कुछ है, या सिर्फ ऐसे ही पेड - पौधे हैं?" अश्या कुत्सित सवालावर, "जंगलच आहे आत!" यापलीकडे मी काही बोलू शकले नाही. बहुतांश पर्यटक जंगलाची पूर्ण सफर का करू इच्छीत नाहीत, किंवा आम्ही पूर्ण trail करण्याची इच्छा दर्शवल्यामुळे येथील लोकांना आश्चर्य का वाटावे, ह्याचे कोडे आत्ता हळूहळू उलगडायला लागले होते. ह्यामध्ये चालण्याचे श्रम करण्याची अनिच्छा किंवा आळस हे कारण नसून, लोकांची जंगलाबद्दलची अनास्था आहे. "जंगलांमध्ये जाऊन काय पहायचं?" अशी काहीशी भावना ह्यामागे दिसून येते.




त्या माणसाच्या लेखीं ह्या जंगलामध्ये मनोरंजक, रोमांचक असं काही नसेलही. माझ्यासाठी मात्र हे जंगल, जगणं समृद्ध करणारा अद्वितीय अनुभव घेऊन आलं होतं. येथे हिरव्यागार रंगाच्या असंख्य रंगच्छटांची कोवळक होती, तशी, धुंद करणारा स्वर्गीय मृद्गंध घेऊन येणारी थंडगार वाऱ्याची झुळुकही होती. बासरीच्या स्वरांना लाजवेल असा पक्ष्यांचा किलबिलाट होता, तसाच त्या संगीताशीं सूर मिळवणारा झऱ्यांचा मंजुळ कलरवही होता! ठायीं ठायीं, सृष्टीने आपल्या कोठारातल्या खजिन्याची मुक्तहस्ताने केलेली लयलूट होती, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ह्या खजिन्याची किंमत ओळखून, रूढी- परंपरांचे कुंपण घालीत त्याला प्राणपणाने जपणारी, त्या ठेव्याताच ईश्वराला शोधणारी माणूसकीही होती!

मौफालाँगच्या त्या पवित्र जंगलामधून एक पानही उचलून बाहेर नेण्याची परवानगी नाही, हे माहीत असूनही, एक गोष्ट मात्र आम्ही तेथून घेऊन जात होतो, ती म्हणजे, त्या जंगलाच्या, मेघालयच्या आणि येथील संस्कृतीच्या, कधीही न विसरता येणाऱ्या आठवणींचा अमूल्य ठेवा!

No comments:

Post a Comment