Thursday 5 May 2022

मेघांच्या माहेरा... भाग ३


मेघालयचा प्रवास निश्चित झाल्यानंतर, इंटरनेटवरून जी माहिती मिळवली, त्यामध्ये मेघालयच्या पश्चिमेकडील डौकी भागाबद्दल बरेच वाचनात आले होतें. म्हणूनच की काय, ह्या भागाला भेट देण्याविषयींं मनात बरीच उत्कंठा होती. त्यामुळे, "डौकीच्या बाजूला न गेलेलेच बरें, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्ता खूपच खराब आहे" असे टॅक्सी चालकाने सुचवतांंच माझा काहीसा हिरमोडच झाला. शेवटीं "जे होईल ते बघू" असे म्हणत, डौकीची वारी करायचीच असे ठरवले, आणि सकाळी सहाच्या सुमारास त्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

जैंंतिया डोंगररांगांच्या कुशीत वसलेला हा प्रदेश शिलॉंगच्या मानाने समुद्रसपाटीवरून काहीसा कमी उंचीवर आहे. त्यामुळे, जसजशी गाडी डौकीच्या जवळ जाते, तसतशी हवामानातली उष्णता काहीशी वाढत जाते. येथील उष्ण वातावरणामुळे ह्या भागात बऱ्याच ठिकाणीं नारळ , सुपारीच्या मोठ्ठाल्या बागाच बागा दिसून येतात. ह्याबरोबरच आंबे, केळी, मिरवेली आणि क्वचित् फणसाची लागवड केलेलीही दिसून येते. एकूणच ते उष्ण वातावरण, झाडेझुडपे, बागायती, ह्यामुळे क्षणभर, "आपण कोकणात तर नाही ना?" असा भास न झाल्यास नवलच!

चेरापुंजीच्या तुलनेत एक बदल मात्र येथे प्रकर्षाने जाणवतो. एक तर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे चहूकडे धुळीचे साम्राज्य मांडून ठेवलेले! चेरापुंजीच्या  वाटेवरील डोंगरमाथे वृक्षवल्लींंनी समृृद्ध, हिरवेगार आहेत. इथेे मात्र  बागाईत केेलेला भाग सोडला, तर डोंगर बऱ्याच ठिकाणीं पार उघडे बोडके वाटतात. कित्येेेक ठिकाणीं तर डोंगरांचे कडे ढासळलेलेही दिसतात. हे ढासळलेल्या कड्यांचे कोडेे काही केेल्या उलगडेना! "हेे काय गौडबंगाल आहे बाबा?" असे ड्रायव्हरला विचारताच त्यानेेे सांगायला सुरवात केली. 

"मेघालयच्या ह्या भागात मोठ्या प्रमाणात कोळशाचा साठा होता. इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डोंगर पोखरलेले दिसतील", तो डोंगरांमध्ये दिसणारी छोटी छोटी भुयारें दाखवत म्हणाला. "ह्या भुयारांमधून गेली बरीच वर्षे कोळसा काढण्याचे काम चालू होते".

"होते? मग आत्ता?" मी विचारले. "अहो मॅडम, बहुतेक ठिकाणी हे काम अवैधरित्या चालायचे. त्या भुयारामधून कामगार आत जाऊन कोळसा काढीत असत. हे जे कडे ढासळलेले दिसतात, ते ह्यामुळेच! काही वर्षांपूर्वी सरकारमार्फत ह्या सगळ्या प्रकारावर बंदी आली खरी, पण तरी इथून कोळसा काढणं काही थांबलं नव्हतं. आता मात्र कोळशाचा साठा हळूहळू संपत आलाय, म्हणजे निदान माणसांकरवी काढून घेता येईल असं काहीही शिल्लक नाहीये आत्ता. म्हणून सगळं थांबलंय! तो सांगत होता. 

मी मात्र हे सगळं ऐकून अवाक् झाले! खनिज काढण्याच्या ह्या पद्धतीला "rat hole mining" म्हणतात. अश्या प्रकारच्या कामांमध्ये केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर भुयारात शिरायला तयार होतात खरे, पण हे करताना कित्येक मजुरांनी भुयारात फसल्यामुळे प्राणही गमावलेले आहेत. आणि हे असं असूनही आत्ता खाणकाम थांबलंय, ते केवळ कोळशाच्या अभावापायीं. माणसाच्या स्वार्थाला अंत नाही, हेच खरे!

डौकीपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर असतांनाच मालवाहू ट्रक्सच्या रांगाच रांगा दिसू लागल्या. काही वेळातच ट्रक्स ची गर्दी वाढत जाऊन वाहतूक जवळ जवळ ठप्प झाली. प्रत्येक ट्रक मध्ये बांधकामासाठी वापरात येणारे मोठ्ठाले दगड भरले होते. 

"हा काय प्रकार आहे?" मी न रहावून विचारले. "मॅडम, इथून बांगलादेशची सीमा जवळ आहे. हे सगळे ट्रक बांगलादेशमध्ये व्यापारासाठी जाणारे आहेत. मेघालयमधील बऱ्याचश्या जमिनी सरकारी नसून, येथील रहिवाश्यांच्या खाजगी मालमत्ता आहेत. त्यामुळे, डोंगराळ भागामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या डोंगरांचे कडे फोडून दगड काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते. बांगलादेशात बांधकामासाठी उपयुक्त अश्या दगडांची टंचाई असल्यामुळे इथून हे दगड निर्यात केले जातात." 

"मग ही वाहतूक कोंडी नेहमीचीच का?" मी प्रश्न केला. " हो, हे नेहमीचं आहे हल्ली!  तो उद्गारला, "दररोज सुमारें एक हजार ट्रक्स भरून माल बांगलादेशला रवाना होतो." त्याचे शब्द कानावर पडत होते. डोकं मात्र ते सगळं ऐकून सुन्न झालं होतं! समोर धुळीच्या लोटात शेकडोंच्या संख्येने जाणारी मालवाहू वाहने, आणि आजूबाजूला, राजमुकट काढून घेतलेल्या शरणागत राजासारखा केविलवाणा भासणारा, तो लचके तोडलेला पर्वतराज, त्याच्यासोबत घडणाऱ्या अन्यायाची साक्ष देतच होते!

त्या कोंडीतून वाट काढत कसेबसे डौकी नदीच्या तीरावर पोहोचलो. डौकी नदी (जिला खासी भाषेत 'उमगोट' असेही नाव आहे) प्रसिद्ध आहे, ती तिच्या स्फटिकासारख्या निर्मळ, नितळ पाण्यासाठी!  हे पाणी इतके स्वच्छ असते की साधारण वीस ते पंचवीस मीटर खोल पाण्याचा तळ आपण सहज पाहू शकतो. असे म्हणतात, की कमालीच्या पारदर्शकतेमुळे पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या पाहताना, त्या हवेत तरंगल्याचा भास होतो.

आज मात्र, हा अद्भुत देखावा पाहण्याचे भाग्य आमच्या नशिबीं नव्हते. आदल्या दिवशींच पाऊस पडून गेल्यामुळे नदीचे पाणी काहीसे गढुळ झालेले होते. पण पाणी गढुळ असले, तरी नदी मात्र नितांतसुंदर! इथे होडीत बसून फेरफटका मारण्याचा मोह न झाला, तर नवलच! छोट्या छोट्या होड्या पर्यटकांना घेऊन पलीकडल्या तीरावर फिरवून आणतात. नावाडीही मोठे रसिक. नाव वल्हवतां वल्हवतां त्याच लयीत एकामागून एक जुनी- नवीन गीतें गुणगुणत सफरीत रंग भरणारे! मग मधूनच एखादा दिलदार पर्यटकसुद्धा, " कितना अच्छा गाते हो! आपको तो इंडियन आयडॉल मे होना चाहिए!" असे भरघोस कौतुक करीत त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो! नदीच्या पलीकडच्या बाजूला बांगलादेशची सरहद्द दिसते.
पाणी कापीत बोट हळूहळू किनाऱ्याला लागते. नदीचा किनाराही कमालीचा सुरेख. विविधरंगी ठिपक्यांची सुबक रांगोळी काढावी, तश्या असंख्य रंगीबेरंगी दगडगोट्यांनी सजलेला. पण ही रांगोळीदेखील पर्यटकांनी फेकलेली चिप्स ची पाकिटे, कोल्ड ड्रिंक चे कॅन आणि दारूच्या बाटल्यांनी विद्रूप केलेली! 






होडीतून फेरफटका मारून परत फिरलो. मनात मात्र कुठेतरी, अलौकिक सृष्टिसौंदर्याची देणगी लाभलेला हा प्रदेश, माणसाच्या कर्मानेच उजाड, रुक्ष आणि प्रदूषित होत चाललाय ह्याचं शल्य बोचत होतं!
 
प्रवासाचा पुढचा टप्पा, म्हणजे आशिया खंडात सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळख निर्माण झालेलं " मौलीनोंग" हे गाव. "आता मौलीनोंगला जाताना वेगळ्या रस्त्याने जाऊ, म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही" आमच्या मनातली धास्ती ओळखून ड्रायव्हर बोलला. विशेष म्हणजे, मौलिनोंगला जाणारा हा रस्ता बरोब्बर भारत - बांगलादेश सीमेशी समांतर रेषेत धावतो! "ही कुंपणापलीकडली शेतं दिसतात ना, ती बांगलादेश मधली आहेत!" तो म्हणाला.गंमत म्हणजे, ह्या भागात राहणाऱ्या बऱ्याच भारतीय लोकांच्या शेत जमिनी बांगलादेश मध्ये आहेत, तर, बऱ्याच बांगलादेशी लोकांच्या मालकीच्या जमिनी भारतात आहेत!

हमरस्त्यापासून काहीसा लांब असल्यामुळे ह्या मार्गावर फारशी वर्दळ नव्हती. डौकीच्या मुख्य मार्गावरून जातांना दिसणारे चित्र इथे मात्र पूर्णपणे पालटले होते! पुनश्च हिरवेगार दिसू लागलेले  डोंगरमाथे, ठिकठिकाणीं खळाळत वाहणारे झरे, हे दृश्य डोळ्यांना सुखावणारे होते. साधारण दीड एक तासाचा प्रवास मौलीनोंग गावाच्या रहिवासी भागाच्या हद्दीपाशी घेऊन येतो. ह्या हद्दीपाशीच वाहनांसाठी पार्किंगची आणि पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची सोय आहे. येथून पुढे, रहिवासी भागामध्ये जाण्यास वाहनांना पूर्ण मज्जाव आहे.

येथे मिळणाऱ्या साध्याच पण ताज्या अन्नाचा आस्वाद घेऊन गावाच्या हद्दीत प्रवेश केला. प्रामुख्याने खासी जमातीच्या लोकांची वस्ती असलेले हे गांव म्हणजे अक्षरशः एखाद्या परिकथेतील चित्रातून सत्यात उतरलेले वाटते. चालायला गुळगुळीत डांबरी समांतर रस्ते, दुतर्फा सावली देणारे वृक्ष, त्यामधून डोकावणारी इवलीशी कौलारू घरे, घरांसमोरील अंगणात अगदी मायेने जोपासलेल्या फुलबागा आणि ह्या सुंदर बागांमधल्या फुलांच्या ताटव्यांचेच रंग चोरून जणु शेकडों चिमुकलीं इंद्रधनुष्यें उडावीत तशीं भिरभिरणारीं फुलपाखरें! गावामधून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी दैनंदिन वापरासाठी पाटामधून सगळीकडे फिरवलेले आहे.

गावचा परिसर अगदी आरशासारखा स्वच्छ ठेवलेला. ठिकठिकाणीं कचरा गोळा करण्यासाठीं बांबूच्या कचराकुंड्या आहेत. संपूर्ण गावात प्लास्टिकवर पूर्ण बंदी आहे. कचराकुंडीत जमलेला कचरा गोळा करून त्याचा खत निर्मितीसाठी वापर केला जातो.








विशेष म्हणजे, ह्या गावात ( आणि तसं पाहिलं तर मेघालय मध्ये सर्वच ठिकाणी) राहणाऱ्या खासी जमातीची संस्कृती प्रामुख्याने मातृसत्ताक आहे. इथल्या कायद्याप्रमाणे सर्व संपत्ती आणि जमिनीचा वारसाहक्क आईकडून सर्वात लहान मुलीकडे जातो. गावातील लोकांची गुजराण, रहिवासी भागाच्या हद्दीबाहेर असलेल्या सुपारीच्या बागायतीवर होते. गावात शाळा, बाजार, प्रार्थनास्थळें अश्या मूलभूत सोयी सोडल्या, तर बाकी सुखसोयी फारश्या नाहीतच! किंबहुना, येथील लोकांच्या अकृत्रिम, साध्या राहणीमध्येच त्यांच्या समाधानी जीवनाचे रहस्य दडले असावे!

मौलीनोंग मध्ये पाहण्यासारखी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, येथील "living tree root bridge" म्हणजेच जिवंत वृक्षांच्या मुळांपासून घडलेला पूल.  मौलीनोंगच्या वेशीपासून काही अंतरावरच एक छोटा धबधबा आहे. धबधब्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी सुमारे दोन शतकांपूर्वी येथील खासी रहिवाश्यांनी मोठ्या कल्पकतेने ह्या पुलाची निर्मिती केली. ह्यासाठी झऱ्याच्या एका बाजूला असलेल्या रबर वृक्षांची मुळें जाणीवपूर्वक वाढवून विरुध्द दिशेला असलेल्या झाडांच्या मुळांमध्ये निगुतीने गुंफली गेली आहेत. त्यानंतर झाडे वाढून मोठी होईस्तोवर त्यांची काळजीपूर्वक निगा राखून हा पूल निर्माण केला आहे.  म्हटल्यास पूर्णपणे नैसर्गक, म्हटल्यास मानवनिर्मित असलेला, साधारण पन्नास माणसांचे वजन पेलवू शकणारा हा पूल, निसर्ग आणि वास्तुशास्त्र ह्यांची सांगड घालून केलेल्या बांधकामाचा अद्भुत नमुनाच म्हणावा लागेल!




मौलीनोंगच्या ह्या जिवंत पुलापाशीं ह्या दिवसाची सफर तर संपली होती. ह्या सफरीत अनुभवलेल्या विरोधाभासामुळे माझे मन मात्र द्विधा मनःस्थितीत होते. एकीकडे झाडाच्या मुळांची घट्ट वीण घालीत एका अर्थीं मानव संस्कृतीची निसर्गाशी नाळ जोडणारे खासी पूर्वज आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आजही निसर्गाचे जतन आणि संवर्धन करीत ते नातें घट्ट करणारे मौलीनोंगमधील रहिवासी, तर दुसरीकडे, आर्थिक विकासाच्या नावाखाली लयाला चाललेला डौकीचा नैसर्गिक ऐश्वर्याचा ठेवा! ह्या दोन मानवी प्रवृत्तींपैकी कोणती प्रवृत्ती तग धरेल, हे तर येणारा काळच सांगू शकेल. पर्यटन आणि व्यापार ह्या मेघालयच्या आर्थिक प्रगतीसाठी वरदान ठरलेल्या दोन्ही गोष्टी येथील निसर्गचक्रासाठीच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठीही अभिशाप ठरतील की काय, ह्याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. निसर्ग  देतो, अगदीं भरभरून देतो. पण म्हणून आपण किती ओरबाडून घ्यायचं ह्याचा विचार शेवटीं आपणच करायला हवा, नाही का?

कडु- गोड अनुभव गाठीशी बांधीत मेघालयच्या प्रवासातला अजून एक दिवस संपला होता.  शिलाँगला निघालो, ते मात्र, ह्या घडीला अंशतः का होईना, सुखरूप असलेला मेघालयचा अमूल्य नैसर्गिक ठेवा, यापुढेही असाच अबाधित राहील का, ही हुरहूर मनात घेऊनच!

No comments:

Post a Comment