Wednesday 20 April 2022

मेघांच्या माहेरा... भाग २

भाग २



उमियाम तलावाच्या काठींं काही क्षण घालवून शिलॉंगला पोहोचलो तोवर अंधार पडला होता. रात्री विमानात झालेले जागरण आणि दिवसभराचा प्रवासाचा शीण, ह्यामुळेच की काय, रूमवर पोहोचल्या पोहोचल्या जी गाढ झोप लागली, ती थेट सकाळी उशिरापर्यंतच. त्यामुळे आदल्या दिवशी, " साडेसहाच्या आत बाहेर पडा, नाहीतर ट्राफिक जॅम मध्ये अडकू"अशी ड्राइवर ने तंबी दिलेली असूनसुद्धा, निघायला साडेसात वाजलेच!

बाहेर बघतो तर काय, वाहनांची ही, मोठ्ठी रांग लागलेली. गोगलगायीच्या गतीने पुढे सरकता सरकता, गाडीतूनच एका अर्थी शिलॉंग दर्शन सुरू झाले.

ह्यापूर्वी, हिमाचल प्रदेश मधील चंबा, सिक्कीममधले गंगटोक ह्यासारखी पहाडी शहरे पाहिली होती.त्यामुळे डोंगराळ भागातील हे शहर कसे असेल, ह्याबद्दल मनातल्या मनात एक चित्रही तयार झालेले होते. शिलॉंग शहराने मात्र प्रथमदर्शनीच त्या प्रतिमेला धक्का दिला. चंबाचा टुमदारपणा शिलॉंगमध्ये नाही. गंगटोकचा नीटनेटकेपणाही नाही. मुळात हे आखीव-रेखीव आणि सुबक बांधणीचे शहरच नव्हे! अनेक छोट्या छोट्या डोंगरांवर अस्ताव्यस्त पसारा मांंडल्यासारखं, काहीसं अजागळ वाटणारं शहर. पण किंबहुना, त्या पसाऱ्यातच ह्या शहराचं सौंदर्य दडलेलं असावं! काळजीपूर्वक निगा राखलेली बागेतली झाडे तर सुंदर दिसतातच. पण कोणतीही देखभाल न करतां ऐसपैस फांद्या पसरून अस्ताव्यस्त वाढलेल्या डेरेदार वृक्षातही विलक्षण मोहकता असते ना, अगदी तस्संच! 

शहराच्या मधोमध जाणारा एकच चिंचोळा रस्ता. दुतर्फा,अगदी गर्दी वाटावी, इतकी दाट वस्ती. घरे आणि माणसेही, फारशी सुखवस्तु नसावीत. पण तरी, निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य केल्यामुळेच की काय, इथल्या माणसांमध्ये उपजतच सौंदर्यदृष्टी आली असावी. छोटेखानी घर असो वा आलिशान बांगला, प्रत्येक घर अगदी हौसेने रंगरंगोटी करून सजवलेलं. घराघरातून परसात किंवा गच्चीवर रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली बाग अगदी हमखास दिसते.

भारताचा सीमाभाग असल्यामुळे ह्या ठिकाणीं भारतीय सैन्यदलाचे प्रभुत्व प्रकर्षाने जाणवते. भारतीय 'ईस्टर्न एअर कमांड' चे मुख्यालय शिलॉंगमध्ये स्थित आहे. ह्याच वाटेवर ईस्टर्न आर्मी कमांड चे १०१ प्रभागाचे मुख्यालयही (area 101 headquarters) आहे. १९७१ च्या युद्धात ह्याच सैन्यदलाची तुकडी पाकिस्तानी सैन्याअगोदर ढाकामध्ये जाऊन थडकली. याचा परिणाम म्हणून पाकिस्तानी जनरल नियाझी यांनी भारतीय सैन्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. ह्या ऐतिहासिक घटनेची साक्ष म्हणून मिळविलेले "फर्स्ट इन ढाका" (ढाका मध्ये सर्वप्रथम) चे बिरुद आजही ही तुकडी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या मानाने मिरवतेय! गेले वर्षभर ह्या विजयाचा सुवर्णमहोत्सव सैन्यदलाने "स्वर्णिम विजय वर्ष" म्हणून मोठ्या दिमाखात साजरा केला. त्या निमित्ताने १९७१ च्या युद्धात महत्वाची कामगिरी बजावलेलेले रणगाडे प्रदर्शनास मांडलेले बघायला मिळाले.

ट्रॅफिक जॅम मधून निघून एकदाचे शहराच्या वेशीबाहेर पोहोचलो, आणि प्रवास सुरू झाला, तो थेट चेरापुंजीच्या दिशेने. चेरापुंजी- कोणे एके काळीं शालेय पुस्तकातून सगळ्यात जास्त पाऊस असलेली जागा म्हणून माहीत झालेली. काही वर्षांपूर्वीच हा मान मेघालयमधीलच मौसीनरामकडे गेला. चेरापुंजी हे केवळ प्रचलित नाव, बरं का! खासी भाषेत ह्या जागेसाठी लाडाचे नाव आहे, "सोहरा". इथेही तसाच वळणावळणांंचा रस्ता. कड्याकपारीमधून दुग्धाभिषेक करावा तसे पांढरेशुभ्र पाणी खळाळत असते. ठिकठिकाणी पर्यटकांसाठी बनविलेले "व्ह्यू पॉईंट्स". येथील छायाचित्रे घेण्यास कॅमेरा अपुरा पडतो. ते सौंदर्य डोळ्यांनीच टिपावे, आणि कायमचे मनात साठवून ठेवावे!




अवतीभवती 'खासी' डोंगररांगा, त्यांवर सदाहरित जंगले. हिमालयीन पर्वतरांगा सुंदर असल्या, तरी भव्यदिव्य, डोळे दिपवून टाकणाऱ्या, गूढ वाटतात. खासी डोंगररांगांचे देखणेपण मात्र, आपले, हवेहवेसे वाटणारे. काही भागामध्ये पाईन सारखी हिमालयीन झाडे सोडली, तर बहुतांश झाडेझुडपेही थेट सह्याद्रीची आठवण करून देणारी. 

अश्याच एखाद्या व्ह्यू पॉइंटचा, डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा पाहून मन नकळतच तिथे रेंगाळते, आणि चालक जणु मनातले ओळखून आपसूकच गाडी तिकडे वळवतो. समोरच्या कड्यावरून खोल दरीत अव्याहत कोसळणाऱ्या धबधब्याचे दृश्य नजरेत साठवता साठवता, मधूनच, अल्लाउद्दीनच्या दिव्यातून अक्राळविक्राळ राक्षस बाहेर पडावा, तसा , त्या दरीतून एखादा मोठ्ठाला ढग बाहेर पडतो, आणि हळूहळू ती दरी, तो धबधबा, इतकेच काय, ते समोरचे डोंगरसुद्धा पार गिळंकृत करून टाकतो! 

हा प्रवास करतां करतांच वाटेत "थ्री स्टेप्स वॉटरफॉल" पहायला मिळतो. तीन टप्प्यामध्ये कोसळणारा धबधबा म्हणून थ्री स्टेप्स. नंतर कधीतरी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी "एलिफन्ट फॉल्स" असे ह्याचे बारसे केले. ह्या धबधब्याच्या एका बाजूला हुबेहूब हत्तीसारखा दिसणारा एक पाषाण होता म्हणे! १८९७ मध्ये झालेल्या भूकंपात तो दगड नष्ट झाला, पण ते नाव चिकटले, ते मात्र कायमचेच!




अजून थोडा पुढे प्रवास केल्यानंतर सोहरापासून साधारण वीस मिनिटे अलीकडे "अरवाह" च्या नैसर्गिक गुंफा आहेत. एक छोटा कच्चा रस्ता ह्या गुंफेजवळ काही अंतरापर्यंत आणून सोडतो. येथून पुढे दगडी बांधकाम केलेली, साधारण पंधरा मिनिटांची पायवाट. 

पायवाटेवरून चालतां चालतां "rugged trail to caves" (गुंफेकडे नेणारी ओबडधोबड, डोंगराळ वाट) अशी एक पाटी दिसली, आणि माझ्यामधला निसर्गप्रेमी , आणि नवऱ्यामधला हाडाचा ट्रेकर काही स्वस्थ बसेना! इकडे रेंगाळलो तर पुढची प्रेक्षणीय स्थळें गाठण्यास उशीर होईल, हें माहीत असूनसुद्धा आम्ही त्या दिशेने मोर्चा वळवलाच! आणि अहाहा! काय सांगावे! आत्तापर्यंत, " नभ मेघांनी आक्रमिले" , हे ऐकले होते. पण इकडे तर, अवघे नभच मेघांना घेऊन पृथ्वीवर माहेरपणाला आलेले! मंदिराच्या गाभाऱ्यात धूप कोंदावा तसा शुभ्र ढगांनी कोंदलेला आसमंत, गाभाऱ्यातल्या ईश्वराच्या मूर्तीसारखे तटस्थ उभे राहिलेले भोवतालचे विशाल वृक्ष, आणि मंदिरातल्यासारखीच प्रसन्न, नीरव शांतता ! एरवी आग ओकत तळपणारा सूर्यसुद्धा इथे मात्र त्या गाभाऱ्यातल्या समईसारखा शांत होऊन तेवत होता! शब्दातीत असे सृष्टीसौंदर्य अनुभवत, त्या जंगलातून वाट काढत गुहेपर्यंत पोहोचेस्तोवर बराच वेळ गेला असावा. 







गुहेपाशी पोहोचलो, तेव्हा फारशी वर्दळ नव्हती. गुहेच्या तोंडापाशीच, " साहब, गाईड की जरूरत हो तो बताइए" असे म्हणत एक तरुण मुलगा समोर आला. "किती पैसे घेणार?" अशी विचारणा करताच, "तुम्हाला योग्य वाटतील तेवढं द्या" असे उत्तर मिळाले. ह्या तरुणाचं नाव 'योमी'. आम्ही हो म्हणताच त्याने उत्साहाने मोडक्या तोडक्या हिंदी-इंग्रजी मध्ये माहिती सांगायला सुरवात केली. 

पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेने तयार झालेल्या आणि डोंगराच्या अंतर्भागात पंचवीस ते तीस किलोमीटर खोलवर पसरलेल्या ह्या गुंफा म्हणजे दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. कोट्यवधी वर्षांपूर्वी इथे पाणथळ भाग असावा. त्यावर दगड मातीचे थरच्या थर गोळा होऊन हे डोंगर निर्माण झाले. हे दगड म्हणजे प्रामुख्याने limestone अर्थात चुनखडीचे होते. ह्या दगडांची पाण्यातील क्षारांशी रासायनिक प्रक्रिया होऊन , ते विरघळले, आणि ह्या गुंफा निर्माण झाल्या. पूर्वी पाणथळ प्रदेश असल्यामुळे ह्या गुहांच्या भिंतींवर शंख-शिंपले, मासे, गोगलगायी अश्या अनेक जलचर जीवांचे साधारण दोन कोटी वर्षे जुने जीवाश्म (fossils) सापडतात.







गुहेच्या मुखातून आत गेलो, की साधारण वीस-पंचवीस फुटापर्यंत पंधरा माणसे आरामात फिरू शकतील अशी ऐसपैस पोकळी आहे. ह्या ठिकाणी पर्यटन खात्याने पर्यटकांच्या सोयीसाठी फरशी टाकून विजेचीही सोय केली आहे. बहुसंख्य पर्यटक ह्या जागी फेरफटका मारून परत फिरतात. इथून पुढे मात्र, ह्या गुंफेला अनेक फाटे फुटतात. गुहा म्हणजे खरोखर काय प्रकरण आहे, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर गाईड घेऊन ह्या भुयारांच्या आत शिरावे.  इथली वाट मात्र खडकाळ आणि खाचाखळग्याची! ह्या खाचाखळग्यांमधून डोंगरातील झरे वाहतात . ह्या भुयारांमध्ये बऱ्याच ठिकाणी वाकून, तर काही ठिकाणी चक्क रांगत जावे लागते. जरा मान उंचावण्याचा प्रयत्न केला, की टाळकें टण्णकन आदळलेच म्हणून समजा! रुंदीही बेताचीच. जेमतेम एक माणूस आत जाऊ शकेल एवढीच! आत, नाकासमोर असलेली गोष्ट दिसू नये, इतका मिट्ट काळोख. त्या तसल्या भयाण अंधारात मोबाईल च्या मिणमिणत्या प्रकाशाचा आधार घेत, हा योमी एखाद्या सारड्यासारखा सरसर आत जातो. ठिकठिकाणी थांबून गुहेची माहिती देतो. गुहेच्या भिंतीवरच्या जीवाश्मांबद्दल भरभरून बोलतो. जनसामान्यांमध्ये असलेल्या claustrophobia अर्थात बंदिस्त जागांच्या भीतीचा ह्याच्या मनामध्ये लवलेशही नाही. त्याचा तो सहज वावर बघून, मला तर पुराणकाळात गुंफांंममधून वास करणारे ऋषीमुनीच आठवले! "ह्याला योमी नाही, योगीच म्हटलं पाहिजे!" मी मनातल्या मनात पुटपुटले.

"ह्या गुहा पंचवीस ते तीस किलोमीटर खोलवर पसरलेल्या आहेत. त्यामधले फक्त दोन ते तीन किलोमीटर इतकाच भाग मानवाने पालथा घातलेला, ज्ञात आहे. एवढ्या भागाचे नाकाशेही उपलब्ध आहेत. " योमी सांगत होता. 

"आपण आत्ता किती खोलवर आलोय?" मी विचारले. "साधारण पाचशे मीटर. ह्यापुढेही जाता येतं, पण त्यासाठी ट्रेकिंग गियर अनिवार्य आहे, कारण पुढचा टप्पा सरपटत पार करावा लागतो" योमी उत्तरला. "तू कुठवर गेला आहेस?" माझा आपला बाळबोध प्रश्न. " तीन किलोमीटर आत जाऊन आलोय" तो अभिमानाने म्हणाला.

गुहेच्या दोन फाट्यामधून आत नेऊन त्याने पार 'डेड एन्ड'पर्यंत दाखवून आणले.अंधारात चाचपडत वाकून चालतां चालतां एव्हाना पाठीला रग लागली होती. चार वर्षाचे आमचे चिरंजीव तेवढे मजेत, न वाकता, इकडेतिकडे बघत फिरत होते! आम्हाला मात्र केव्हा एकदा मोकळ्या हवेत श्वास घेतो, असं झालेलं. पण योम्याचा उत्साह काही मावळत नव्हता! "आता एकदाचं बाहेर ने बाबा" असं सुचवतांंच, "जरा थांबा, एक शेवटची गंमत दाखवतो" असे म्हणत, परवानगीची वाट न बघतांं तो अजून एका भुयारात शिरलासुद्धा! थोडं पुढे गेल्यानंतर इथे मात्र थोडीशी मोठी पोकळी होती. खाली झऱ्याचं पाणी. आश्चर्य म्हणजे, गुहेच्या वरच्या भागातला कातळ फोडून, डोंगराच्या पृष्ठभागावरील झाडांची मुळे, पाण्याच्या शोधार्थ गुहेत दाखल झालेली दिसत होती!

गुहा पाहून बाहेर पडलो, तोवर संध्याकाळ झालेली होती. आम्ही ठरवलेल्या कार्यक्रमापेक्षा अंमळ उशीरच! म्हणजे, गुहेत जाताना केलेल्या जंगलातल्या भटकंतीने आमचा तब्बल एक दीड तास घेतला असावा. सहाजिकच मौसमाई गुंफा आणि सोहरामध्ये असलेला नौखालीकाई धबधबा पाहण्याच्या आमच्या कार्यक्रमाला कात्री बसणार होती. शेवटी, जवळच असलेल्या व्ह्यू पॉईंट वरून दिसणारा "सेव्हन सिस्टर्स" (सप्त धारांनी कोसळणारा)  धबधबा पाहून आम्ही प्रवास आटोपता घेतला. 

"गुहेमधून लवकर निघालांं असतांं तर राहिलेल्या दोन्ही गोष्टी पाहता आल्या असत्या तुम्हांला!" ड्राइवर हळहळत होता. पण मला त्याचे तिळमात्रही दुःख नव्हते. घाईघाईने गुंफा पाहून आलो असतो, तर कदाचित प्रवासातले एक दोन जास्तीचे टप्पे पार पडलेही असते. पण, त्या न चोखळलेल्या वाटेने चालतां चालतां जे गवसलं, ते मात्र गवसलं नसतं! नेहमीचा सरळ सोप्पा राजमार्ग सोडून, मुद्दाम कधीतरी ह्या वाकड्या वाटांंवरून वाटचाल करावी. शेवटी, प्रवास काय आणि आयुष्य काय, ह्या न मळलेल्या वाटाच ते समृद्ध बनवीत असतात. ह्या वाटांवरून मुक्कामस्थळींं पोहोचायला काहीसा वेळ लागतो हे मान्य. बऱ्याचदा ते उद्दिष्ट साध्य होतंच असंही नाही! पण तसंही, मंदिरात गेल्यानेच ईश्वरप्राप्ती होते, असं कुणी सांगितलंय? कधी कधी वारीतसुद्धा पांडुरंग भेटतो, नाही का?

Monday 11 April 2022

मेघांच्या माहेरा...भाग १

भाग १


दोन वर्षें कोव्हिड, आणि तत्पूर्वीं दोन वर्षें माझ्या आरोग्याच्या तक्रारी, ह्यामुळे गेली चार वर्षे मोठ्या प्रवासाचा योग आला नव्हता. त्यांत पुरी-कोणार्क-भुवनेश्वर असा प्रवास करण्याच्या माझ्या मनसुब्यांंना, फेब्रुवारी २०२२ मध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेने पार जलसमाधी दिली. त्यानंतर, एप्रिल महिन्याच्या सुमारास पुरी-भुवनेश्वर मध्ये उन्हातान्हात भटकण्याचे अग्निदिव्य करण्याची हिम्मत माझ्यात नक्कीच नव्हती! हो-नाही करतांं करतांं  मेघालयचा पर्याय समोर आला, आणि पूर्वेकडील ह्या इटुकल्या प्रदेशाची वारी करायची ह्यावर एकदाचं शिक्कामोर्तब झालं!

२७ मार्च २०२२ रोजी, गोवा ते कोलकाता, आणि कोलकाता ते गोवाहाटी असा प्रवास करून दुपारच्या सुमारास आम्ही गोवाहाटी विमानतळावर पोहोचलो. तेथून पुढे शिलॉंग पर्यंतच्या प्रवासासाठी टॅक्सी ठरवली होती. 

ऐन उन्हाळ्यात चेहऱ्यावर थंडगार गुलाबपाण्याचा शिडकावा करावा तशी आल्हाददायक हवा; अलगद एका डोंगरावरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर वळणे घेत फिरणारे चौपदरी, पण नागमोडी रस्ते, चहूबाजूला पांढऱ्याशुभ्र ढगांचा साज ल्यालेले हिरवेगार डोंगर , मधूनच दिसणाऱ्या इवल्याश्या वस्त्या, त्यामधून फिरणारी गोबऱ्या गालांची गोंडस मुले आणि निसर्गदत्त पहाडी सौंदर्य मिरवणारे तरुण-तरुणी- प्रवासच असा डोळ्यांचे पारणे फेडणारा, की मुक्कामाचाही क्षणभर विसर पडावा! 

साधारण दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर शिलॉंगच्या अलीकडे काही अंतरावर उमियाम तलाव लागतो. हा तब्बल २२० चौरस किलोमीटरवर पसरलेला विस्तीर्ण तलाव. तलावाकाठी पोहोचलो, तेव्हा फारतर दुपारचे चार वाजून गेले असतील. तरी पूर्वोत्तर प्रदेश असल्यामुळे सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकायला लागलेला. मावळतीच्या किरणांचे सोने विरघळून सोनसळी झालेल्या पाण्यातून बोटीचा प्रवास, म्हणजे अहाहा.. पर्वणीच! आकाशाचे लख्ख प्रतिबिंब दाखवणारे आरशासारखे स्वच्छ पाणी कापत, मधूनच पाण्याचे तुषार चेहऱ्यावर उडवत छोटेखानी बोट निघते, तलावातून मोठ्ठा वळसा घेत फिरते. मधूनच एखादं छोटंसं बेट दिसतं. हिवाळ्याच्या पहाटे बाळाने हट्टाने आजीची उबदार दुलई पांघरावी, तसं ढगांची मऊशार दुलई पांघरून निवांत पहुडलेलं! 

"गोव्याहून मेघालय मध्ये येऊन कसलं बोटींग करता??"  ह्या सहप्रवाश्याच्या प्रश्नावर मी नुसतीच हसले. त्या पंधरा मिनिटांच्या बोटीच्या प्रवासानंतर त्याला ते उत्तर मिळालं असेलच! गोव्यातल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन स्पीड बोटने फिरण्याचा थरार काही औरच आहे. पण मेघालयच्या धुंद पावसाळी वातावरणात त्या नितांतसुंदर जलाशयातला तो फेरफटका अविस्मरणीय होता, हे नक्कीच!